राम तेरी गंगा मैली हो गयी…पापीओंके पाप धोते धोते!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राम तेरी गंगा मैली हो गयी…पापीओंके पाप धोते धोते!
-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गंगास्नान चर्चेचा विषय
2014 ला प्रथम सत्तेवर येताच ‘नमामि गंगे’ योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गंगा शुद्धीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. सर्वांनी स्वागत केले! मात्र, गंगा शुद्धीकरण करता करता प्रधानमंत्री मोदी यांना स्वत:चेच शुद्धीकरण करून घ्यावे लागत आहे, हे कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवार, दि. 13 डिसेंबर 2021 रोजी वाराणशी-काशीचा कायापालट करणार्या योजनांचा शुभारंभ केला. त्यानंतर गंगास्नान केले. प्रधानमंत्री मोदींच्या गंगास्नानाचे विविध अर्थ मीडियातून प्रतिबिंबित झाले. सोशल मीडियाही अपवाद नाही. सोशल मीडियात प्रधानमंत्री गंगास्नान करतानाचा व्हिडीओ व्हायरल करताना ‘राम तेरी गंगा मैली हो गयी…पापीयोंके पाप धोते धोते…’चा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियाची स्वतंत्र नजर असून आजमितिला स्वतंत्र अस्तित्व आहे. सोशल मीडियाच्या या ट्रेंडचा बहुजन शासक मीडियाने वेध घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘पापी’ कारकीर्दीचा चित्रमय धांडोळा घेतला आहे.
1. गुजरात दंगल-2002 :
दि. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्राकांड घडल्यानंतर गुजरात दंगल घडली. त्यात कित्येक निरपराध लोक जिवंत जाळले गेले. या दंगलीला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची चिथावणी होती, असा आरोप करण्यात आला. तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली. गुजरात दंगल भारताच्या इतिहासात काळे पान म्हणून स्मरणात राहील. हे ‘पाप’ मोदीजी कसे धुऊन काढणार?
2. लोकशाहीचा खून :
मंदिर समजून संसदेच्या पायर्यांचे दर्शन घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 ला संसदेत प्रवेश केला. हा भारतीय लोकशाहीचा खून होता, संविधानाची पायमल्ली तर संसदेचा अपमान होता. संसदेला उत्तरदायी नसणे हे मोदीजी ‘पाप’ आहे.
3. नोटाबंदी :
दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेला विश्वासात न घेता नोटाबंदी लागू केली. त्यामुळे भारतीय चलनातील एक हजार व पाचशेंच्या नोटा बाद ठरविण्यात आल्या. मात्र, काळा पैसा काही वापस आला नाही. उलट काळा पैसा व्हाईट करण्यास नियोजनबद्ध मदतच झाली. या नोटाबंदीच्या काळात हजारो लघु आणि मध्यम उद्योगांना टाळे लावावे लागले. कोट्यवधी लोकांना नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले, त्यात शेकडो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. मोदीजी, हे ‘पाप’ तुमचा आयुष्यभर पिच्छा सोडणार नाही.
4. जीएसटी करप्रणाली :
1 जुलै 2017 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात एकतर्फी जीएसटी करप्रणाली लागू केली. ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले गेले. जीडीपी ढासाळला, बेरोजगारीचा दर वाढला. असे अनाकलनीय निर्णय मोदीजी, ‘पाप’ आहे.
5. पुलवामा हल्ला :
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा या प्रतिबंधित क्षेत्रात भारतीय सैनिकांवर हल्ला झाला. ज्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले, येथे 56 इंच छातीचा कोट कामाला आली नाही. उलट या हल्ल्याचा 2019 च्या निवडणुकीत गैरवापर करण्यात केला, शहीद सैनिकांच्या टाळूवरचे लोणी खाणे, हे मोदीजी, ‘पाप’ आहे.
6. लॉकडाऊन :
कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता मार्च 2020 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात एकाचवेळी लॉकडॉॅऊन जाहीर केला. परिणामी कोट्यवधी मजुरांना पायपीट करत हजारो किलोमीटर पायी जावे लागले, शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले. अन्न-पाण्यावाचून अनेकजण तडफडून तडफडून मरण पावले, कोट्यवधींचे रोजगार गेले. लघु आणि मध्य उद्योग बुडाले, सेवाक्षेत्र डुबले, मजुरांचे बेहाल झाले. भेदरलेले मजूर आजही आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यास धजावत नाहीत, मोदीजी, हे ‘पाप’ कुठे फेडाल?
7. शैक्षणिक धोरण :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शिक्षण धोरण-2020 संसदेत चर्चा न करताच जाहीर केले. जनतेचे धोरण चर्चाविना लागू करून संसदेचा अपमान करताना संविधानाची पायमल्ली केली. या शैक्षणिक धोरणाबाबत आलेल्या आक्षेपांना केराची टोपली दाखवताना स्वअजेंडा रेटला. ज्याचे दूरगामी परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. भांडवलदार धार्जिणे, खासगीकरणाचा पुरस्कार करणारे आणि वर्णव्यवस्था मजबूत करणारे धोरण देशावर लादले. यामुळे मुठभरांचे उखळ पांढरे होईल; परंतु देश गुलाम होईल. मोदीजी, हे ‘पाप’ नाही का?
8. एनआरसी-सीएए आंदोलन :
एनआरसी-सीएए विरोधात देशभर आंदोलन छेडण्यात आले. दिल्लीत दीर्घकाळ हे आंदोलन चालले. हे आंदोलन चिरडण्यासाठी दिल्ली दंगल मोदी सरकारच्याच काळात घडली. लोकशाहीला प्रत्येक वेळेला ठोकशाहीने उत्तर दिल्या गेले. हे सर्वकाही गंभीर असून मोदीजी, हे ‘पाप’ आहे.
9. शेतकरी आंदोलन :
तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर शेतकरी आंदोलन झाले. प्रधानमंत्री मोदी सरकारने या आंदोलकांच्या वाटेत खिळे रोवले, बॅरिकेट्स लावले, शेतकर्यांवर अश्रूधूर सोडले, शेतकर्यांना अतिरेकी संबोधले, खलिस्तानी म्हणून टोकले. लोकशाही मार्गाने सुरू असेलेले आंदोलन चिरडण्यासाठी मोदी सरकारने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करताना लोकशाही संकेत धुडकावून लावले. त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्याच्या मुलाने शेतकर्यांवर गाड्या चालवून चिरडले, ज्यात चारजणांचा बळी गेला. संसदेत तीन कृषी कायदे मागे घेण्याची नामुष्की ओढावली, तरीही लाज न वाटणे, मोदीजी, ‘पाप’ आहे.
या ठळक बाबींबरोबरच मोदी सरकारच्या कारकीर्दीतच जस्टीस लोया खून प्रकरण, मॉबलिंचिंग, शहरानपूर दंगल, हथरस बलात्कार प्रकरण, उनाव प्रकरण, कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरण..आदी…आदी काळीमा फासणार्या घटना घडल्या. सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण, घोटाळेबाजांना मोकळे रान, घोटाळेबाजांचे कर्ज माफ, न्यायालयीन संस्थेवर अंकुश, निवडणूक आयोग मुठीत, प्रसार माध्यमे खिशात आणि बोलणार्यांचा गळा घोटण्याचे काम मोदी सरकारने केले.
दरम्यान राफेल विमान घोटाळा चौकशी सुरू असताना आणि पुलवामा हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने खडे बोल सुनावले असताना 8 डिसेंबर रोजी भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन 14 जण शहीद झाले. ही घटना मोदी सरकारचे अपयश मानली जात आहे.
गंगास्नान करून मोदीजी, या सर्व घटनांचे ‘पाप’ कसे धुऊन काढणार?, असा प्रश्न जनता विचारीत आहे.
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा