प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?
भास्कर सरोदे, नवी दिल्ली, छत्रपती संभाजीनगर :
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत अनुत्साही वातावरणात पार पडले. आमंत्रित पाहुण्यांनी साहित्यिकांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्हं उठवत चांगलेच तोंडसूख घेतले. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन 21, 22, 23 फेबु्रवारी 2025 रोजी ‘कही खुशी कही गम’च्या वातावरणात पार पडले. या दोन्हीही संमेलनांकडे प्रेक्षकांनी फिरविलेली पाठ आयोजकांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. त्याबरोबरच आता अशा निरूपयोगी संमेलनाची गरज आहे काय, असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.
हिंदूंच्या देव्हार्यात बुद्ध का नाही? - डॉ. तारा भवाळकर
अखिल भारतीय मराठी संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात वैदिक धर्माची पोलखोल केली. यज्ञात पशुहत्या करत भरमसाठ मांसाहार करणारे वैदिक धर्मीय होते; पण यज्ञ संस्थेला विरोध करणार्या भगवान बुद्धाचा प्रभाव आणि उपदेशामुळे लोक मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्मात परिवर्तीत होऊ लागले. त्यामुळे वैदिक धर्म अडचणीत आला आणि वैदिकांनी शाकाहाराचा पुरस्कार करायला सुरुवात केली. त्याचवेळी बुद्ध विरोधी प्रचार करायला सुरुवात केली. तथापि, बुद्ध काही साम, दाम, दंड, भेद अशा कोणत्याही नितीने बधत नाहीत असे पाहिल्यावर शरणांगती पत्करत आपलासा करण्याचा कावा करून बुद्ध आमचाच असून तो विष्णूचा नववा अवतार आहे, असे घोषित केले.
मात्र, आजही कुठल्याही वैदिक किंवा हिंदूंच्या देव्हार्यात अगदी छोट्या छोट्या देवता असतील; पण भगवान बुद्धाचा फोटो किंवा मूर्ती असत नाही. असे का? असा प्रश्न करत तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे कोडगेपण चव्हाट्यावर आणले.
ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की, तथागत बुद्धाला देव्हार्यात बंद करून त्यांचे विचार संपविण्याचे संकेत तर डॉ. तारा भवाळकर देत नाहीत ना, अशी शंका यायला वाव आहे. कारण अडीच हजार वर्षांपासून बुद्ध विचार संपविण्याचे षडयंत्र कार्यान्वित करूनही तो संपत नाही, उलट तो अधिकच व्यापकच बनत चालला आहे, त्यामुळे त्याला देव्हार्यात बंद करा, असे तर डॉ. भवाळकर सुचवत नाहीत ना?
त्यामुळे डॉ. तारा भवाळकर यांच्या विधानाने हुरळून जायची गरज नाही, तर त्यामागील मतितार्थ समजून घेण्याची गरज आहे.
19 वे विद्रोही साहित्य संमेलन-2025 :
संविधानिक मूल्यांना समर्पित आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आयोजित 19 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आमखास मैदान, छत्रपती संभाजीनगर येथे 21, 22, 23 फेब्रुवारी, 2025 रोजी उत्साहात पार पडले. तथापि, लौकिकाला साजेशी उंची न गाठताच संमेलनाचे सूप वाजले, ही उणीव बरेच काही सांगून जाते. यामुळे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीय का, असा प्रश्न पडणेही साहजिकच आहे.
विद्रोही साहित्य संमेलनाची क्षणचित्रे...
1. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या ऐतिहासिक महानाट्याने प्रेक्षकांची मने जिंकली. अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला (शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी 2025) हा प्रयोग सादर झाला.
2. 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांच्या भाषणाने छाप सोडली.
संमेलानाध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी जीवक प्रकाशनच्या स्टॉलला भेट दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक राणा यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 विषयीच्या धोक्यांबाबत रोखठोक मत व्यक्त केले. त्यांच्या या धाडसाबद्दल खूप खूप अभिनंदन.
3. ‘होय, मी सावित्री जोतीराव फुले बोलते’, प्राचार्य वृषाली रणधीर यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग प्रेषकांची मने जिंकून गेला.
4. विशेष व्याख्यानात ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले यांच्या ‘संविधान आणि लोकशाहीला कॉर्पोरेट मनुवाद्यांचे आव्हान’ या व्याख्यानाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
सुप्रसिद्ध शिल्पकार तथा चित्रकार विकास सरवदे, सुप्रसिद्ध चित्रकार नानू नेवरे यांच्याबरोबर माझ्यासारख्या पत्रकाराला काहीक्षण घालवता आले. शिल्पकार, चित्रकार आणि पत्रकारांच्या जबाबदार्या आणि आव्हानांबाबत झालेल्या चर्चेत चित्रकारांच्या अडचणी समजून घेता आल्या. अशा दिग्जांची सोबत मिळाली, हा गोड अनुभव मनाच्या कोपर्यात साठवून ठेवण्यासारखा आहे.
5. जयपूर उच्च न्यायालय परिसरातील मनुच्या पुतळ्याला काळं फासणार्या कांताबाई अहिरे व शीलाताई पवार या लढवय्या रणरागिणींचा सत्कार विद्रोहीचे आकर्षण ठरले.
6. सुप्रसिद्ध चित्रकार नानू नेवरे यांचे चित्र प्रदर्शन, प्रा. प्रतिभा अहिरे यांच्या कविता-पोस्टर प्रदर्शनाने कलाप्रेमींना तृप्त केले.
7. अॅड. धनंजय बोरडे व इंजिनिअर सतीश चकोर या नवनेतृत्वाचा उदय, ही या संमेलनाची उपलब्धी म्हणावी लागेल.
8. बूकस्टॉलला जास्त भाडे लावल्याने विक्रेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. अर्ध्यापेक्षा जास्त स्टॉल रिकामेच राहिल्याने आगाऊचा भुर्दंड आयोजकांवर पडला.
9. संमेलनाकडे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ, हा विषय आयोजकांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. नियोजनातील ढिसाळपणा, व्यक्तिकेंद्रीपणा, प्रचार-प्रसारातील उणिवा, नाविण्याचा अभाव, याबाबत लोक उघडपणे बोलताना दिसले.
10. एकूणच 16, 17, 18 नंतर 19 वे संमेलन नवी उंची गाठेल असे वाटले होते. तथापि, तसे काही होऊ शकले नाही, याला आयोजकांचा अतिआत्मविश्वास नडला का, याचाही विचार व्हावा.
माजी समाजकल्याण सचिव आर. के. गायकवाड यांनी जीवक प्रकाशनच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचे निमंत्रक भीमसेन कांबळे, विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश चकोर आदी.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा