गोष्ट सावित्रीबाई फुलेंच्या आद्य पूर्णाकृती पुतळ्याची..!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गोष्ट सावित्रीबाई फुलेंच्या आद्य पूर्णाकृती पुतळ्याची..!
धुळे येथील सावित्रीबाई फुले यांचा ऐतिहासिक पूर्णाकृती पुतळा इतिहासाच्या खानाखुणा स्पष्ट करीत आहे.
सावित्रीबाई फुलेंच्या 127 व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात विशेष लेख!
-राजाराम सूर्यवंशी
या लेखाला निमित्त होते पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव दिल्यानंतर त्या विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे!
बरोबर 25 महिन्यांपूर्वी 14 फेब्रुवारी 2022 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला होता. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यामधून आणि तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमधून सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.
हा भव्य असा 12 फूट उंचीचा सावित्रीबाई फुले यांचा हा पूर्णाकृती पुतळा पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये मुख्य इमारतीच्या आवारात उभारण्यात आला आहे. कात्रज, पुणे येथील परदेशी स्टुडिओमध्ये हा भव्य पुतळा बनविण्यात आला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात उभारलेला सावित्रीबाई फुले यांचा पुतळा लोकभावनेला साजेसा असल्याचे दिसत आहे.
सावित्रीबाई फुलेंच्या या पूर्णाकृती पुतळ्याची किंमत काही लाख रुपयांमध्ये असून या कार्यक्रमामध्ये तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो़र्हे, विरोधी पक्ष नेते देवेद्र फडाणवीस, खा.गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चाकणे व समता परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा खुद्द पुण्यात उभारला जावा व तो ही पुणे विद्यापीठात, विद्येच्या माहेर घरात, विद्येच्या मंदिराला सावित्रीबाई फुलेंचे नाव देऊन त्याच विद्येच्या मंदिराच्या मुख्य इमारतीसमोर जागेत बसवला जावा हा नियतीने सावित्रीबाईंच्या त्याग व कार्याला दिलेला न्याय होता! या कृतीने भारतातील तमाम समतावादी जनतेला अत्यानंद झाला होता. तो सहाजिकच होता. कारण ज्या अतुलनिय अशा त्यागातून व परंपराधिष्ठित रुढींना आव्हान देऊन प्रवाहाविरुद्ध चालण्याचे धाडस सावित्रीबाईंनी दाखविले होते. त्यासाठी त्यांनी टोकाची निंदा-नालस्ती सहन केली होती, सासर्यांनी घराबाहेर हाकलले होते, समाजाने बहिष्कार टाकला होता, अशा एकाकी अवस्थेत केवळ महात्मा जोतीराव फुले, सगुणाबाई क्षीरसागर, फातिमा शेख, लहुजी बुवा उस्ताद व स्वतःची विवेकबुद्धी एवढ्याच जमेच्या बाजू घेऊन ज्या निष्ठेने त्या उभ्या राहिल्या, अतुलनिय मनोधैर्याने शिक्षण व समाजसेवेचे व्रत निभावले होते. सोबत अनाथ असलेल्या दत्तक मुलाचा सांभाळ करायचा होता, सत्यशोधक समाजाचे कार्य व समतावादी विचारात खंड पडू द्यायचा नव्हता, मुली व महिलांना पुरुषी दास्यातून सोडवायचे होते, तशी खंबीर मानसिकता बनवून, विश्वाविरुद्ध लढण्याची ताकद एकवटून त्यांनी हे कार्य केले होते. त्यासाठी या गौरवावर त्यांचा हक्क होता. नियतीने तो त्यांना मोठ्या सन्मानाने बहाल केला होता. मात्र, त्यासाठी त्यांना 125 वर्षे वाट पहावी लागली होती.
समाज कार्यकर्त्यांची सावित्रीबाईंच्या पवित्र कार्यावरील अपरिमित श्रध्दा व अनुकूल वेळ येण्यासाठीची प्रचंड सबुरी याचे ते फळ होते.
ज्या ज्या लोकांनी, संस्थांनी व संघटनांनी, विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि समाजातील सर्व स्तरातील जाणकारांनी या सन्मानिय कार्यात आपापला खारीचा वाटा उचलला होता, ती सर्व मंडळी व सामाजिक घटक हे सुद्धा अभिनंदनाला पात्र होते.
सावित्रीबाई फुलेंचा त्याग व कार्य एवढे महान आहे की, प्रत्येक शहरात, प्रत्येक विद्येच्या मंदिरात त्यांचा पुतळा उभारला तरी त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा आपला प्रयत्न कमीच पडेल! सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा गावोगाव उभारला जावा या संकल्पनेतून आपल्याला ज्ञात आहे की, पुण्याबाहेरही काही गाव, शहर व राज्यांमध्ये यापूर्वीच सावित्रीबाई फुलेंचे काही मोजके पूर्णाकृती पुतळा उभारले गेले होते! पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा हा त्या अर्थाने महाराष्ट्रातील व देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा नव्हता.
हे सांगण्याचे कारण असे की, पुणे विद्यापीठात या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन पार पडले होते. त्यानंतर दि.29 नोव्हेंबर 2021 रोजी ऑनलाईन लोकमतने भावनेच्या भरात वा उत्साहात अशी बातमी दिली होती की, पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात उभारला जाणारा सावित्रीबाई फुलेंचा हा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा असेल! ( Marathi News पुणे The first full size statute of Savittribai Phule n the country will be erected atPune University.)
हे विधान थोडेसे वस्तुस्थितीला धरून नव्हते. कारण त्या आगोदर नांदेड येथे दि.3 जानेवारी 2021 रोजी व औरंगाबाद येथे 17 सप्टेंबर 2021 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे पूर्णाकृती पुतळे उभारले गेले होते. पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे. म्हणजे नांदेड व औरंगाबाद येथील पूर्णाकृती पुतळे उभारल्या नंतरची ही घटना आहे.
तसेच, दक्षिण भारतातील एकट्या तेलंगणात सावित्रीबाई फुलेंचे शंभराहून अधिक पूर्णाकृती पुतळे हे 2011 ते 2021 या कालखंडात उभारले गेले असल्याची माहिती तेथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननिय सुकुमार पेटकुळे या सत्यशोधकाने मला दिली आहे. यातील सर्वच पुतळे मेटलचे नसून बरेचसे सिमेंट व प्लास्टिकपासून तयार केलेले आहेत. तथापि, ते सर्व पूर्णाकृती पुतळे आहेत.
एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेला तेलंगणा आज सत्यशोधकांचा बनला आहे.
उत्तर प्रदेश राज्यात सन्माननिय मायावती या मुख्यमंत्री असताना (1995 ते 2012 या कालखंडात सुश्री. मायावती या चार वेळा मुख्यमंत्री बनल्या होत्या.) त्यांनीही सावित्रीबाईंचे काही पूर्णाकृती पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते.
तेलंगणामध्ये जशी सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळे उभारण्याची चळवळ चालवली जात आहे, तशीच चळवळ महाराष्ट्रातही सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची एक अनोखी चळवळ आजपासून सुमारे 27 वर्षापूर्वी चालवली गेली होती. त्या चळवळीतून आणि लोक सहभागातून जो सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा, पुणे विद्यापीठात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अगोदर किमान पाव शतकापूर्वी उभारला गेला होता, त्याची सत्यघटना मी येथे देत आहे.
ही माहिती जेवढी अद्भूत व प्रेरणादायी आहे तितकीच ध्येयनिष्ठेने भारावलेली आहे, ती पुतळा उभारण्याची चळवळ होती आणि ती चळवळ धुळ्यात चालवली गेली होती.
हाडाच्या समाजवादी कार्यकर्त्यां विजयाताई चौक यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ आजपासून 35 वर्षांपूर्वी चालवली गेली होती. सन्माननिय विजयाताई चौक यांचे पुत्र प्रा. प्रीतम चौक सर व प्रख्याद गांधीवादी-सर्वोदयवादी विचारवंत सन्माननिय रमेश दाणी सर यांनी सादर केलेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यावरून मी हा लेख लिहित आहे.
या विषयावर त्यावेळी रमेश दाणे सरांनी एक महत्वपूर्ण लेख लिहून या कार्याला शब्दबद्ध केले होते. या ऐतिहासिक; परंतु दुर्लक्षित कार्याची नोंद इतिहासाच्या पटलावर 27 वर्षांपूर्वी कोरुन ठेवली होती. त्या महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लेखात रमेश दाणी सरांनी म्हटले होते की, ‘आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या प्रारंभी धुळ्यामध्ये महाराष्ट्रातील आगळे वेगळे असे स्मारक उभारण्याचा संकल्प सोडला गेला होता. त्याचा पहिला टप्पा म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा दि.10 मार्च 1997 रोजी उभारला गेला होता...’
धुळ्यातील सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा निदान महाराष्ट्रातील तरी प्रथम पूर्णाकृती पुतळा होता व तो पुणे विद्यापीठात दि.14 फेब्रुवारी 2022 रोजी अनावरण करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या किमान पाव शतक अगोदर उभारण्यात आला होता.
मला सांगायला आवडेल की, महाराष्ट्रातील स्त्रीजागृतीविषयक व स्त्रीमुक्ती चळवळीची जेवढी केंद्रे त्याकाळी होती त्यात धुळ्यात समाजवादी महिला सभेचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. सातत्याने क्रांतीची, परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी विजयाताई चौक यांच्यासारख्या कार्यकर्त्या येथे सतत परिश्रम घेत होत्या.
कौटुंबिक छळ होणार्या स्त्रियांपासून परिततक्त्या, विधवा आदी सर्व स्त्रियांचे प्रश्न विविध पातळ्यांवरून विजयाताई चौक व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या अनेक वर्षांपासून मार्गी लावत होत्या. स्त्रियांवर अत्याचार करणार्या प्रत्येक प्रवृत्तीला उखडून फेकण्याचे काम त्यांनी धुळे जिल्ह्यात केले होते. हुंडाबळी असो, जळीत स्त्री असो, यांना न्याय देण्याच्या आणि गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी समाजातून उठाव घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊन स्त्रियांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. परिणामी कामासाठी स्त्री निर्भयपणे बाहेर पडू लागली होती. सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळारूपी स्मारक उभारण्याची निकड विजयाताईंना याच कार्याच्या प्रेरणेतून निर्माण झाली होती. या पुतळारूपी स्मारकाकडे त्या चळवळीच्या अंगाने पाहात होत्या. त्याला चळवळीचे स्वरूप प्रदान केले होते.
पुतळे उभारून कार्य होत नाही उलट पुतळा उभारला की, जबाबदारी संपली अशी समाजाची धारणा असते. मात्र, धुळ्याच्या समाजवादी महिला सभेची भूमिका तशी नव्हती. पुतळा उभारून त्यातून सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा घ्यावी आणि स्त्री उद्धाराच्या व्यापक योजना हाती घ्याव्या, असा क्रांतीकारी संकल्प समाजवादी महिला सभेने व तिच्या नेत्या विजया चौक यांनी सोडला होता.
सोडलेला संकल्प कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी जी धडपड करावी लागते ती समाजवादी महिला सभा आणि विजयाताई चौक यांच्याकडून शिकावी एवढी कार्य आणि संकल्पनिष्ठा विजयाताईंमध्ये ठासून भली होती.
विजयाताईंनी या पुतळा उभारणीला चळवळीचे स्वरूप देऊन धुळे शहरातील विविध क्षेत्रातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांना एका विचारपीठावर आणून स्मारकाची योजना मांडली होती. त्यासाठी क्रांतीज्योती फुले स्मारक समिती, धुळे या नावाची स्मारक समिती 1996 साली खुद्द विजयाताई चौक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केली गेली होती. या समितीचा कार्यकाळ 1996 ते 1997 एवढा फक्त दोन वर्षांचा होता. हाती घेतलेले काम जिद्दीने व झटपट पूर्णत्वास नेणे हा विजयाताईंचा स्वभाव होता.
1996 साली स्थापण करण्यात आलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे होती...
अध्यक्षा : मा. विजयाताई चौक, सेक्रेटरी : श्री. रमेश दाणे, खजिनदार : प्रा. पी. डी. दलाल, सदस्य : श्री. दशरथ तात्या, सौ. स्मिता भावसार-कुलकर्णी, प्रा. मु. ब. शाह, अॅड. प्रकाश परांजपे, श्री. बापू ठाकूर, कॉ. डॉ. रा. भ. चौधरी, कॉ. भाई मदाने (संपादक व मालक दै. आपला महाराष्ट्र), श्री. निंबा खताळ, श्री. राम मोरे... याशिवाय तत्कालीन आमदार राजवर्धन कदमबांडे, आ. जे. यु. ठाकरे, शिवाजीराव मराठे, ल. अ. कपोले, किशोर सोनवणे, रावसाहेब भंडारी तसेच सन्माननिय महिला कार्यकर्त्या मंदाताई घासकडदौस, सुषमा दाते, सुलभा भानगावकर अनुराधा गरुड, अश्विनी गरुड, मालती मराठे, रजनी कुलकर्णी, सुमन शिंपी यांच्यासारख्या अनेक सदस्यांनी आणि सर्वसामान्य स्री-पुरुषांनी या सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती स्मारक कार्यात सहभागी होऊन या पवित्र कार्यास पूर्णपणे योगदान देण्याचे मान्य केले व त्या दिशेने प्रत्यक्ष कृतीशील सहभाग नोंदवायला सुरुवात केली होती.
जागेचा प्रश्न होता. त्यासाठी देवपुरातली जुन्या मोठ्या ब्रिटिशकालीन पुलाशेजारच्या दलित वस्तीत असलेल्या रोहिदास उद्यानातली पृर्वेकडील दिशेची असलेली जागा मुक्रर करण्यात आली. धुळे नगरपालिकेकडून तशी रीतसर परवानगी प्राप्त करण्यात आली.
यासर्व घडामोडी 1996 सालातल्या होत्या. सर्वात महत्त्वाचा प्रश्न पुतळ्याचा होता. सावित्रीबाईंचा हा पूर्णाकृती पुतळा मुंबई-पुण्याच्या कमर्शियल आर्टिस्ट कडून बनवून घ्यावा का? असा प्रस्ताव प्रथम पुढे आला होता; परंतु त्याला किमान दोन-अडीच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, हे काम चळवळीचं होते. धुळ्यातील सर्वसामान्य जनतेतून 1996-97 साली एवढा पैसा उभा करणे अवघड होते. त्याऐवजी एखाद्या सेवाभावी स्थेतून पुतळा तयार करण्यात यावा, असा विचार सर्वश्री रमेश दाणे सर व इतर मान्यवरांनी मांडला व तो सर्वानुमते मान्य करण्यात आला.
त्यासाठी खामगावच्या टिळक राष्ट्रीय विद्यालयाला हे काम देण्यात यावे असे विचारांती समितीने ठरवले. नफा जास्त न घेता कामाचा दर्जा अव्वल राखून त्यांना द्यायच्या पैशातून मुलांच्या शिक्षणाचा व भोजनाचा खर्च या विद्यालयाला भागवता येईल व तसे विधायक कार्यही सावित्रीबाई स्मारक समितीकडून घडेल, या हेतूने समितीतर्फे टिळक राष्ट्रीय विद्यालयाला ही पुतळ्याची आर्डर देण्यात आली होती.
खामगांवचे टिळक राष्ट्रीय विद्यालय हे स्वातंत्र्य चळवळीचे जिवंत स्मारक म्हणून म. गांधीच्या प्रेरणेने 24 जानेवारी 1921 रोजी स्थापण करण्यात आले होते. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व विदेशी वस्तुंवर बहिष्कार या चार तत्त्वांवर या विद्यालयाचा कारभार चालत असे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना बलशाली, निरोगी व आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी येथे हस्त कलेचे, कलाकुसरीचे, कारागिरी व शारीरिक शिक्षण दिले जात असे. स्वदेशी व राष्ट्रवाद ही या संस्थेची ओळख होती. आज शंभर वर्षांनंतरही विद्यालयाचे कामकाज याच तत्त्वाने सुरु आहे.
1996 साली विद्यालयातील कलावंत सुधाकर आजबे, त्यांचे सहकारी वसंत झाडोकर, हरिश्चंद्र गिरी यांच्या टिमने अवघ्या सहा महिन्यात सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी ब्राँझ धातूमध्ये कढा़ई करून दिली होती.केवळ 75 हजार रुपयात सव्वा सहा फुटी पूर्णाकृती पुतळा या संस्थेने तयार करून दिला होता. या पुतळ्याची किंमत पुण्या-मुंबईत 1997 साली अडीच लाखापेक्षा कमी नव्हती. लोकभावनेचा आदर व चळवळीचे काम म्हणून राष्ट्रीय विद्यालयाने हे काम त्यांच्या तत्त्वानुसार करून दिले होते. या पार्श्वभूमीवर धुळ्यातील अन्य पुतळ्यांचा खर्चही लाखोंच्या घरात (1995-97 साली ) होता, हे जनता व जाणकारांच्या लक्षात आले होते.
धुळ्याच्या समाजवादी महिला सभेच्या कार्यकर्त्यांनी शाळेतल्या मुलांपासून ते मोठ-मोठ्या व्यक्तींपर्यंत फक्त 1-1 रुपया गोळा करून हा पैसा उभा केला होता. काही जाणकार, समजदार व चळवळीचे मूल्य जाणणार्या व्यक्तींनी स्वतःहून आपापल्या परीने या पुतळ्याच्या उभारणीच्या कामात आर्थिक योगदान दिले होते. सक्ती कोणावरही केली नव्हती.
पुतळ्याची आर्डर दिल्यानंतर प्रख्यात समाजवादी नेत्या श्रीमती मृणाल गोरे यांच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते.
पुतळा तयार झाल्यावर दि.10 मार्च 1997 रोजी या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समाजकार्यात तोलामोलाचा वाटा असणार्या प्रमिला दंडवते यांच्या हस्ते झाले होते. प्रसिद्ध साहित्यिका शांता शेळके, डॉ. अरुणा ढेरे, मृणालताई गोरे यांची उपस्थिती या कार्क्रमाला लाभली होती. या कर्तबगार सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या साक्षीने धुळे शहरातील महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या या प्रकल्पावर व सावित्रीबाई फुलेंच्या कार्याच्या गौरवावर शिक्कामोर्तब झाले होते.
धुळ्याच्या समाजवादी महिला सभेने व सभेच्या नेत्या विजयाताई चौक यांनी या स्मारकाच्या माध्यमातून भव्य सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे ठरविले होते. महिलांसाठी ‘सावित्री’ पुरस्कार योजना सुरु करण्यात आली होती. त्याशिवाय गृह कार्य करणार्या महिलांना स्वयंरोजगारासाठी उद्योग प्रशिक्षण केंद्र, समृद्ध वाचनालय, मोफत कायदेशीर सल्ला केंद्र, विधवा-परितक्त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत योजना आणि आत्मरक्षणासाठी तरुणींना प्रशिक्षण देण्याची योजना व उपक्रम या स्मारकाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले होते. अशा या प्रकारचे बहुउद्देशीय असे महाराष्ट्रातील हे पहिलेच स्मारक होते.
तसेच धुळ्यातील सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा ठरला होता.
(गेल्याच वर्षी या पुतळ्याचे 25 वर्षांनंतर नव्याने सुशोभिकरण करण्यात आले असून ते विद्यमान नगरसेवक आयु. नागसेन दामोदर बोरसे, वॉर्ड क्र.17, धुळे महानगरपालिका, धुळे यांच्या विकास निधीतून करण्यात आले आहे. )
या ऐतिहासिक पूर्णाकृती पुतळ्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आले. काही ठिकाणी पुतळ्यांच्या कोनशिला नष्ट करून पुतळ्यांचा इतिहास पुसण्याचे करण्याचे काम तथाकथित शासन-प्रशासनाने केले आहे. यात औरंगाबाद पुतळ्याचा प्राधान्याने समावेश करावा लागेल.
औरंगाबाद येथील औरंगपुरा येथे समाजक्रातीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांच्या समवेत सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शहराचे ऐतिहासिक महत्त्व ठासीव करत आहे. तथापि, या पुतळ्याची कोनशिला उपलब्ध नसल्याने यावर विस्ताराने भाष्य करता आले नाही, ही खंत आहे.
( टिप : सन्माननिय संपादक व विचारवंत भास्कर सरोदे, युवा विद्यार्थिनी आयुष्यमती पूजा धावडे, श्री. प्रीतम चौक सर, सन्माननिय विचारवंत, संपादक व सुप्रसिद्ध गांधीवादी तथा सर्वोदयवादी कार्यकर्ते रमेश दाणे सर, तसेच तेलंगणाचे ज्येष्ठ सत्यशोधक सुकुमार पेटकुळे यांनी दिलेली माहितीनुसार व प्रत्यक्ष पुरवलेल्या कागदपत्रांवरून हा महत्त्वपूर्ण लेख तयार करण्यात आला आहे. या लेखाच्या निर्मितीत या सर्वांचा मोलाचा वाटा असल्याने मी हा संशोधनपर लेख लिहू शकलो आहे. म्हणून या सर्वांच्या ऋणात राहणे लेखकाला आवडेल.)
(लेखक हे सामाजिक विचारवंत असून त्यांच्या ‘युगस्त्री सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या असून या पुस्तकावर ‘सावित्री एक क्रांती’ ही दूरदर्शन मालिका चालवली गेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने समिती व महात्मा फुले चरित्र साधने समिती यांचे ते सन्माननिय माजी सदस्य आहेत.)
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा