रशिया-युक्रेन युद्ध : भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रशिया-युक्रेन युद्ध : भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
केंद्रातील भाजप सरकार प्रचारात मश्गुल; 20 हजार विद्यार्थ्यांची आर्त हाक ऐकणार कोण?
भास्कर सरोदे, औरंगाबाद :
रशियाने आज मंगळवार, दि. 1 मार्च 2022 रोजी युक्रेवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात एक भारतीय विद्यार्थ्याला मृत्यू आल्याचे विदेश मंत्रालयाने जाहीर केले. 21 वर्षाचा नवीन शेखरप्पा हा कर्नाटकच्या चलागेरी येथील होता. जेवण आणण्यासाठी बाहेर पडला असता, झालेल्या बॉम्बहल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने देश शोकसागरात बुडाला असताना भाजप सरकार मात्र, निवडणूक प्रचारात मश्गुल आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून वेळीच मदत झाली असती तर, या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला नसता, हे निवडणुकीची झिंग चढलेल्यांना कसे कळणार?
रशिया-उक्रेन युद्धाचा आज सहावा दिवस. युद्ध होण्याची शक्यता लक्षात येताच अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आम्हाला सुखरूप भारतात घेऊन जा, असे आर्जव केले. मात्र, सुमारे 20 हजार भारतीयांचे आर्जव भाजप सरकारच्या कानापर्यंत पोहोचलेच नाही. कारण सरकार इतके निवडणूकजीवी आणि खासगीकरणजीवी झाले आहे की, त्यांना त्यापलीकडे काहीही दिसत वा सुचत नाही. देशाचे भावी भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबत भाजप सरकारने दाखविलेली असंवेदनशून्यता, आजवरच्या इतिहासात कुणीही दाखविली नसेल!
वैद्यकीयची शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा प्रहराजने एनडीटीव्हीला सांगितले की, नवीन फक्त जेवणाची व्यवस्था करण्यासाठी बाहेर पडला होता आणि तो एका रेशनच्या दुकानासमोर रांगेत उभा होता. पूजाच्या म्हणण्यानुसार वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था तिथेच केली जाते. मात्र, नवीन गव्हर्नरच्या बंगल्याच्या मागील एका फ्लॅटमध्ये राहत होता. एक तासापेक्षा जास्त वेळ तो रांगेत उभा होता, तेव्हा हवाई हल्ल्यात गव्हर्नरचा बंगला उडविण्यात आला आणि त्यातच नवीनही मारला गेला. वसतिगृहात राहणारा श्रीधरन गोपालकृष्णन् म्हणतो की, नवीनचा मृत्यू युक्रेनी वेळेनुसार सकाळ 10.30 वाजता झाला. जेथे नवीनचा मृतदेह ठेवण्यात आला आहे, तेथे जाण्यास आम्ही हतबल आहोत.
पूजा पुढे सांगते की, खार्कीव्हमध्ये रशियाकडून जोरदार बॉम्ब हल्ले होताहेत. येथे अडकलेले विद्यार्थी खूपच धास्तावलेले आहेत. कारण हे सर्व नुकतेच 12 वी झालेले 17-18 वर्षाचे मुलं आहेत. काहीजण बेशुद्ध होताहेत. परिस्थिती फारच गंभीर आहे. भारत सरकारने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करायला हवेत.
...याचाही विचार करा!
युक्रेनची लोकसंख्या सुमारे साडेचार कोटी! भारतातील अनेक राज्य यापेक्षा मोठी आहेत. तरीही भारतातील हजारो विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. कारण तेथे आपल्यापेक्षा शिक्षण स्वस्त आहे.
एकीकडे आपण जागतिक महासत्ता होण्याच्या गोष्टी करतो, आत्मनिर्भर होत आहोत असे म्हणतो आणि दुसरीकडे शिक्षणासाठी आपल्याहून किती तरी लहान असलेल्या देशात आपल्या विद्यार्थ्यांना जावे लागते! ही गोष्ट विचार करायला लावणारी नाही काय?
आपल्याकडील शिक्षणसंस्था कोणाच्या वळचणीला बांधल्या आहेत, हे एक उघड गुपित आहे. सत्ता समीकरणे जुळवणे व कॅपिटेशन फीस आकारून अफाट निधी गोळा करणे, यांसाठीच आपल्या शिक्षणसंस्था कार्यरत आहेत. कोणालाही असे वाटत नाही की, जागतिक दर्जाच्या पहिल्या दहा-पंधरा विद्यापीठांत माझ्या संस्थेचा समावेश व्हावा! माझे सगेसोयरे, माझे जातभाई व माझे डावे-उजवे कसे पोसले जातील, हाच जर आपल्या शिक्षणसंस्थांचा हेतू असेल तर जगाच्या नकाशावर नालंदा-तक्षशीला विद्यापीठांचा हा देश चमकणार कसा? सर्वांना परवडेल असे शिक्षण आम्ही का देऊ शकत नाही? निदान फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात तरी यांवर कार्यवाही व्हायला नको काय?
खरे तर शिक्षण क्षेत्रांतील अशा मूलभूत मुद्यांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून इतर भावनिक मुद्दे उपस्थित करून त्यात जनतेला व्यस्त ठेवले जाते. शिक्षणाबाबत सरकारी धोरणे काय आहेत, ती योग्य आहेत की अयोग्य, अयोग्य असतील तर ती बदलण्याची गरज आहे का? या अशा प्रश्नांवर व्यापक चर्चा का होत नाही? कॉलेजमध्ये हिजाब घालावा की स्कार्फ, यापेक्षा त्या कॉलेजची फी किती आहे, हे कधी विचारले जाणार? युक्रेन वा अमेरिका-युरोप असा बाहेर जाणार हा पैसा देशातच नाही का थाबविता येणार?
आज युक्रेन-रशिया वादात जग भारताकडे आशेने पहात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे; पण यासोबतच आपल्या तरुणाईला शिक्षण घेण्यासाठी युक्रेनसारख्या छोट्या देशावर अवलंबून रहावे लागते, याचाही आपण सर्वांनी विचार करायला हवा!
या विद्यार्थ्याचे बलिदान तरी बाकीच्या भारतीय विद्यार्थ्यांना वाचवू शकेल की नाही?-सामाजिक प्रसार माध्यमांवर प्राप्त
नवीन शेखरप्पा |
टीप 1 : खासगीकरणाचे काँग्रेसी धोरण भाजप जोरकसपणे राबवत आहे. एअर इंडियाचे खासगीकरण झाले नसते तर, कदाचित युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी सुखरूप आणता आले असते, अर्थात सरकारच्या संवेदनशीलतेचा तो भाग आहे. आता जनतेने खासगीकरणाचे समर्थन करायचे का, हे ठरवावेच लागेल.
टीप 2 : नालंदा-तक्षशिला विद्यापीठांत शिक्षणासाठी जगभरातून विद्यार्थी येत. आज त्याउलट परिस्थिती आहे. कारण मनुवादी व्यवस्था. युक्रेनमध्ये भारतापेक्षा वैद्यकीय शिक्षण स्वस्त आहे म्हणून हजारो विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी जातात, ही बाब भारतासाठी लाजीरवाणी आहे, असे कितीजणांना वाटते? राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 जशास तसे लागू झाले तर यापेक्षाही वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल. रिजेक्ट एनईपी-2020.
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
खूप छान आणि परखड. खरचं काँग्रेसच्या खाजगीकरण मोहिमेचा भाजपा वेगाने विस्तार करत आहे.
उत्तर द्याहटवाSonal Pawar
उत्तर द्याहटवाExactly , it is right present government's Dissisions are very irresponsible which negative impacts are Doing on Indian society. This editorial is very good which shows reality with real facts👍🙏🙏🙏